राजकारण स्वार्थाकडे वळले की राष्ट्राची वाटचाल विनाशाकडे होत असते. परदेशात गेलेले राहुल गांधी घाईघाईने परतले व त्यांनी प्रचारासाठी महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवला आणि तेथेच काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव निश्चित झाला, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी नवीन नाशिकमधील पवननगर क्रीडांगणावर झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, उत्तर प्रदेशचे खासदार जगदंबिका पाल, पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते व सुनील बागूल, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, दिनकर पाटील, सतीश सोनवणे, प्रथमेश गीते, जगन पाटील, शशिकांत जाधव यांसह भाजप नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. योगी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जय श्रीराम’ने केली. महाराष्ट्र ही देवभूमी असून ही संतांची, देशभक्तांची, क्रांतिवीरांची, जवानांची आणि शेतकर्यांची भूमी असल्याने ही भूमी आमच्यासाठी सदैव वंदनीय असल्याचे ते म्हणाले.