कसारा-इगतपुरीदरम्यान गुरुवारी, ११ जुलैला सकाळी कसारा घाटातील स्टेशन २ व ३ मध्ये दरड कोसळल्याने नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावरील दोन्हीही बाजुच्या गाड्या काही वेळासाठी थांबविण्यात आल्या होत्या. अर्ध्या तासानंतर डाऊन लाईनवरील गाड्या मिडल (पर्यायी) मार्गावरुन सोडत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कसारा घाटातील हिवाळी पुलालगत असलेल्य रेल्वे रुळावर अचानक दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मलबा हा डाऊन (मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर) पडलेला असल्याने, सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या रेल्वे गाड्या काही मिनिटांसाठी थांबविण्यात आल्या. मुंबईवरुन जाणाऱ्या गाड्या कल्याण-ठाणे रेल्वे स्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या. पीडब्ल्यूआय (रेल पथ अभियंता) पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मलबा दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.