पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्ये आणि दिलेली आश्वासने कशी फोल आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सभांमध्ये दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकीय क्षितीजावरून काढून टाकण्याचा निर्धार व्यक्त करत राज यांच्या सभांमधून ते मोदी, शहांवर शरसंधान साधत आहेत. कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्येही आता राज यांची तोफ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धडाडणार आहे. नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असून मोदी, शहांबरोबरच राज ठाकरे आता दत्तक नाशिकचाही पर्दाफाश करणार असल्याने युतीला घाम फुटला आहे.
मागील पाच वर्षांत मनसेची पुरती वाताहात झाली असली तरी आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ‘कमबॅक’ पक्षाला उर्जा देणारे ठरणार आहे. मनसेने या निवडणुकीत उमेदवार दिले नाहीत. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे. या प्रचारसभांमधून राज ठाकरे भाजपच्या कार्यकाळातील योजना कशा फसव्या ठरल्या याचा पंचनामा करीत आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींना ‘टार्गेट’ केले आहे. नाशिकमध्येही २६ एप्रिलला राज यांची सभा होणार आहे. यावेळी राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांची सभा ज्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. त्याच मैदानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. त्यामुळे मोदी, शहांवर तोफ डागताना दत्तक नाशिकचा पर्दाफाश करण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे. तसेच नाशिकमध्ये सत्तेत असताना सामाजिक उत्तर दायित्वातून सुरू केलेली कामे जसे, टाटा गुु्रपच्या माध्यमातून साकारण्यात आलेले बोटॅनिकल गार्डन, शहरातील लिंकरोड, वाहतूक बेटांचा केलेला विकास, पूल, गोदापार्क, गंगापूर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने साकारण्यात आलेले इतिहास संग्रहालय, होळकर पुलावर साकारण्यात आलेला म्युझिकल फाउंटन यासह पाचशे कोटींच्या विकासनिधीच्या माध्यमातून शहरात केलेल्या विकासकामांचाही लेखाजोखा मांडला जाईल. मनसेच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा आढावा मांडतांना दत्तक नाशिकची गत पाच वर्षात कशी पिछेहाट झाली याचाही पर्दाफाश राज करणार आहेत. याकरता मनसेकडून शहरातील विकासकामांचा पंचनामा करण्यात येत आहे.
या स्थानिक मुद्यांचा होणार पंचनामा
- नाशकात घरपट्टीत केलेली अव्वाच्या सव्वा वाढ
- करयोग्य मूल्यात झालेली वाढ
- स्मार्ट सिटींअंतर्गत शहरातील अपूर्ण कामे
- नाशिक शहर बससेवा
- हरितक्षेत्र विकास
- गोदावरी संवर्धन
- कपाटकोंडी
- साडेसहा आणि सात मीटर रस्त्यांजवळील बांधकामांना टीडीआर बंदी
- खुंटलेला औद्योगिक विकास
- वाढती बरोजगारी
- वाढत्या शेतकरी आत्महत्या
- शेतमालाचे कोसळलेले दर
- शेतकरी आत्महत्या
- मनसेच्या काळात केलेल्या कामांकडे झालेले दुर्लक्ष