अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असतानाच आता, या प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू झाले आहे. बिहारच्या आयपीएस अधिकार्याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. याप्रकरणी बिहार पोलिसांना निरपेक्षपणे तपास करू द्यावा. मुंबई पोलीस चांगले काम करत आहेत, मात्र कधीकधी राजकीय दबावामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर भूमिकेवर टिका केली.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सोमवारी (दि.३०) नाशिकला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरंटाईन केले. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. याविरोधात भाजपने आंदोलनही केले. याबाबत फडणवीस म्हणाले, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. याच पोलिसांसोबत मी काम केले आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस चांगले काम करत आहेत. मात्र, कधीकधी राजकीय दबावामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. बिहार पोलिसांना क्वॉरंटाईन का केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बिहार पोलिसांना जो तपास करायचा तो करू द्यावा. तपास मुंबई पोलिसांनी करावा कि, बिहार पोलिसांनी याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल. महाराष्ट्र सरकारवर यामुळे संशय निर्माण होत आहे. तो सरकारने दूर करावा, असे सांगत सरकारच्या सध्याच्या भूमिकेमुळे जनतेच्या भावनांचा अनादर होत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर तोशेरे ओढले..