नाशिक जिल्ह्यात तापमानात पून्हा एकदा मोठी घट झाली असून गोदावरी घाट परिसरात थंडीने तीघा भीक्षेकर्यांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब शनिवारी ९ फेब्रुवारीला समोर आली. रस्त्यावरील लोकांचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या सेवा सेवाभावी संस्थेच्या निदर्शनास ही बाब प्रथमत: आली. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणा, शिवडी, उगाव, पिंपळगाव, मांजरगाव परिसरात सकाळी पारा थेट शून्यावर पोहचला. तर कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी येथील हवामान केंद्रावर ३ व लासलगावला ५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे शेतातील पिकांवर तसेच वाहनांवर बर्फाची चादर तयार झाली आहेत.
तापमानाची या घटीचा द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह फळबागा आणि रब्बी पिकांना चांगलाच झटका बसला आहे. रविवारी, १० जानेवारीलाही कडाका कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात अन्यत्रही तापमानात मोठी घट झाली आहे. अनेक भागात दवबिंदू गोठून, त्याचे बर्फात रुपांतर झाले. महाबळेश्वरला वेण्णा लेक परिसरात तापमान शून्य अंशावर गेले आहे.
गायब झालेल्या थंडीचे जोरदार आगमन झाल्याने नाशिक जिल्हा गारठून निघाला आहे. नाशिकमधील गोदाघाट परिसरात तीन भीक्षेकर्यांचा थंडीने बळी घेतला आहे. सकाळच्या सुमारास सेवा संस्थेचे समन्वयक संजय बागूल हे बेघर लोकांच्या सर्वेक्षणासाठी गोदाघाटावर आले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. तिघेही वयोवृध्द असून त्यांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. गोदाघाट परिसरात रात्रीच्या वेळी अक्षरश: हिमालयात बसल्यासारखा अनुभव येतो असे येथील व्यावसायिकांनी सांगितले.
पुदिन्यावर बर्फाची चादर
लासलगाव – थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. थंडीत उबदार कापडे घालणे तसेच घर बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. वाढत्या थंडीमुळे गहू, हरभरा पिकांना फायदेशीर ठरत आहे .कसबे सुकेणा येथे पुदिन्यावर बर्फाची चादर तयार झाली आहे. तयार झालेल्या द्राक्षमालाचे भाव कोसळत आहे. यातच काडाक्याचा थंडीमुळे परिपक्व द्राक्षमाल तडकून मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वेण्णा लेक परिसरात सर्वाधिक थंडी
महाबळेश्वर ० अंशावर, निफाड ३, दवबिंदू गोठले असून नाशिक ४, पुणे ५.१, परभणी ७.३, मुंबई ११ अंशावर आहे. महाबळेश्वर येथील नागरिकांनी वेण्णा लेक परिसरात या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव घेतला. येथील बोट क्लबच्या जेटींवर, स्ट्रॉबेरीच्या मळ्यात, फुले, पाने, गाड्यांच्या टपावर, घराच्या पत्र्यांवर तसेच घराच्या बाहेर मळ्यामधील बादल्यांमध्ये साठवणूक केलेल्या पाण्यावर बर्फाचा पापुद्रा तयार झाला होता.
नाशिकला मोसमातील निचांकी तापमान
नाशिक शहरात जानेवारीला यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद शनिवारी झाली आहे. शहरात किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले असून, पुढील तीन दिवसांमध्ये आणखी थंडीचा कडाका राहण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.
थंडीचे पुनरागमन का?
नाशिकला गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावरून येणार्या बाष्पयुक्त वार्याचा प्रभाव होता. त्यामुळे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेला किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. पण, या बाष्पयुक्त वार्याचा प्रभाव ओसरला आहे. त्याच वेळी उत्तर भारतातून येणार्या थंड वार्यांमुळे राज्यात पुन्हा थंडी पडत आहे. शहरातील पुढील तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने थंडीचा कडाका अजून वाढेल, असा अंदाज आहे.
निवारागृहांची गरज
गोदाघाटावरील भगवान चक्रधर स्वामी मंदिराच्या समोरील बाजूस दोन भीक्षेकरी मृतावस्थेत आढळले. पुलाजवळील भागात तिसरा भिक्षेकरी मृत झालेला होता. येथील भीक्षेकर्यांना निवारागृह उपलब्ध व्हावे. – संजय बागूल, समन्वयक, सेवा संस्था
थंडीमुळे झाले मृत्यू
गोदाघाटावरील तिघा मृत व्यक्तींनी उबदार कपडे घातले होते. शिवाय त्यांच्या अंगावर दोन ते तीन गोधड्या होत्या. तरीही थंडीने त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसते. – सचिन सेनभक्त, प्रत्यक्षदर्शी