नाशिक : शहरांसह गावांमध्येही घराबाहेर पडण्यास बंदी घातलेली असली तरी अत्यावश्यक कामांसाठी लोक बाहेर जातात. त्यांना हात सॅनीटायझरने स्वच्छ केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्याची मोहिम जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत व आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्यात येत असून सोशियल डिस्टनसिंग, फवारणी, दवंडीच्या माध्यमातून ग्रामीण जणतेचे प्रबोधन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनची फवारणी करण्यात येत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये शेतकर्यांनी यासाठी विनामोबदला ट्रॅक्टरदेखील उपलब्ध करुन दिले आहेत. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामीण भागात ही मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हात धुण्याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून अंगणवाडी सेविका घरोघरी जावून हात धुण्याचे महत्व ग्रामस्थांना पटवून देत आहेत. कुंडाणे (ता.कळवण) तसेच ससने (ता.पेठ) ग्रामपंचायतीमध्ये तर हात धुवूनच ग्रामस्थांना गावात प्रवेश देण्यात येत आहे.