डांगसौंदाणे ग्रामपंचायतीची सुमारे ७५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी शुक्रवारी (१७ मे) सायंकाळी पाचच्या दरम्यान कोसळली. या घटनेत पाणीपुरवठा योजनेचे कर्मचारी बाळू सोनवणे बचावले आहे.
पाच ते सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कोसळली. टाकी कोसळताच ग्रामस्थांनी गर्दी केली. सुमारे ४३ लाख रुपये मंजूर ही पाणीपुरवठा योजना दोन टप्प्यात होती. २७ लाख रुपये डांगसौंदाणेसाठी तर उर्वरित रक्कम ही एकलव्य वस्तीच्या पाणी योजनेसाठी होती. तत्कालीन पाणीपुरवठा सचिव व ग्रामपंचायत सदस्य कैलास बोरसे यांच्या काळात योजना सुरू झाली. ग्रामपंचायतीत सत्तापालट झाल्यावर ही योजना वादात सापडल्याने तत्कालीन सचिव व सत्ताधार्यांमध्ये मोठा वाद झाला. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सिंधु सोनवणे यांनी योजनेचा ताबा सत्ताधार्यांना मिळावा, यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला. अपूर्ण पाणी योजना पूर्णत्वासाठी ग्रामस्थांच्या मागणीचा जोर वाढू लागल्याने प्रशासनाने तत्कालीन दप्तर जैसे ते ठेवत उर्वरित पैशात सदरची पाणी योजना पूर्णत्वाससाठी परवानगी देत योजना पूर्ण केली. एका सचिवाच्या काळात टाकीची पायाभरणी तर दुसरे सचिव संजय सोनवणे यांच्या काळात टाकीचा वरचा भाग तयार झाला होता. निकृष्ट काम करणार्या तत्कालीन ठेकेदारासह संबंधित विभागाच्या अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दोषींवर कारवाई करावी
पाणी टाकी कोसळल्याने ग्रामपंचायतीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या योजनेची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. – वैशाली बधान, उपसरपंच, डांगसौंदाणे.
निकृष्ट दर्जाचे काम
सदर पाणी टाकीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. कमिशन आणि अति पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी तत्कालीन सत्ताधार्यांनी बांधलेली टाकीची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी. – सुरेश वाघ, अध्यक्ष स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ.