राज्यभरात सुमारे ७० हजार कोटी खर्चुन १ लाख २० हजार विहीरी बांधल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात असेल तर, राज्यातील २८ हजार गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर का केले, असा सवाल राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेत उपस्थित केला. सिंचनासाठी खर्च केलेले ७० हजार कोटी गेले कुठे, हे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यानिमित्ताने राज्यातील दुष्काळाचा गंभीर बनलेला मुद्दा ऐरणीवर आला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राज ठाकरे यांच्या सभेचे नाशिकमध्ये शुक्रवारी, २६ एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी सिंचनात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडतानाचा नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता दाखवणारा व्हिडिओ सादर केला. जलसंपदा मंत्री नाशिकचे पालकमंत्री असतानाही, अशी परिस्थिती असेल तर अन्यत्र हा प्रश्न किती उग्र असेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बर्ड्याची वाडी येथील पाण्याची भीषणताही यातून दिसली.