महाविकास आघाडीच सरकार या पुढच्या निवडणुकाही एकत्रित लढतील असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यातही आता शिवसेना भाजपसोबत राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार उत्तम काम करत आहे. असेही पवार यावेळी म्हणाले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीचा अंतिम भाग प्रसिध्द झाला. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
मुलाखतीत राऊत यांनी ठाकरे सरकारचं भविष्य काय? असा थेट प्रश्न पवारांना विचारला. त्यावर परखड मत व्यक्त करतानाच पुढील निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे सरकार पाच वर्षे चांगलं चालेल, याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. पुढील निवडणुकाही एकत्रित लढू, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
ऑपरेशन कमळचा उपयोग नाही
काहीजण म्हणालेले तीन महिन्यात सरकार पडेल पण तसं झालं नाही आता सहा महिने झाले. काही लोकांनी सप्टेंबर तर काही लोकांनी आता ऑक्टोबरचा वायदा केला आहे. पण माझी खात्री आहे सरकार पाच वर्ष उत्तम काम करेल. आणि ऑपरेशन कमळ असो वा अन्य काही असो त्याचा काहीही परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
मुलाखतीच्या कालच्या भागात उद्धव ठाकरे सरकार सहा महिन्याच्या परीक्षेत पास झाल्याचं कौतुक पवारांनी केलं होतं. आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्येसुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. असं म्हटलं होतं.
हे ही वाचा – परीक्षा पूर्णपणे रद्द करणे अव्यवहार्य, मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केलं स्पष्ट!