निसर्ग चक्री वादळामुळे दापोली, मंडणगड तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील १८ हजार घरे तर मंडणगड तालुक्यात ८ हजार घरांची पडझड झाली आहे. या भागात सरकारी यंत्रणेचे काम सुरू झाले असले तरीही अजूनही कोणत्याही प्रकारची ठोस आर्थिक मदत शासनाकडून जाहिर झालेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी रायगड जिल्हाची तातडीने पाहणी करून १०० कोटींच्या तत्काळ मदत घोषित केली. मात्र रायगड जिल्ह्याला लागून असलेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यासाठी अद्याप कोणत्याही ठोस मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले नाही.
रायगड जिल्ह्याला तातडीने मदतीचा हात पुढे केला असताना मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांची दखल का घेतली नाही? असा सवाल येथील हतबल सर्वसामान्य नागरीकांकडून करण्यात येत आहे. वादळाच्या घटनेस ७२ तास उलटून गेले तरी जिल्ह्याचे पालक मंत्री अनिल परब यांनी देखील अद्याप जिल्हातील या नुकसानग्रस्त भागाला भेट दिलेली नाही.
दापोली, मंडणगडच्या किनारी भागातील मुरुड, सालदुरे, मुर्डी, आंजर्ले, आडे,पाडले, केळशी या गावांतील नारळ, सुपारी आणि आंब्याच्या ९० टक्के बागा पूर्णतः उद्ध्वस्थ झाल्या आहेत. वादळामुळे महावितरणचे खांब जागोजागी पडले आहेत त्यामुळे येथील विज पुरवठा पूर्णतः खंडीत झाला आहे. गेल्या ७२ तासांपासून दापोलीतील विज पुरवठा खंडीत झाला आहे. महावितरण तसेच एनडीआरएफ टिम यांचे काम सुरू असून एकंदर परिस्थिती पाहता येथील गावांतील विजपुरवठा सुरळीत होण्यास १५ दिवसाचा कालावधी लागू शकतो. येथील बहुसंख्य लोकांची उपजीविका ही कृषी उत्पादनांवर होत असल्यामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे व्हावेत, अशी मागणी येथील नागरीकांकडून करण्यात येत आहे.