गेल्या काही दिवसांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना जाता येणार का? आणि आलं तर ते कसं आणि कोणत्या अटींवर? यावर मोठी चर्चा झाल्याचं दिसून येत आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने काही अटींचे मेसेज देखील सोशल मीडियावर मध्यंतरी व्हायरल झाले होते. मात्र, या सगळ्यानंतर कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांना कोरोना चाचणी आणि जिल्ह्यात आल्यानंतर ७ दिवस क्वारंटाईन होणं असे काही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चाकरमान्यांसाठी महत्त्वाची मागणी केली आहे. कोकणात येणाऱ्यांची प्रवास सुरू करण्यापूर्वीच मोफत चाचणी करावी, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. आपल्या पत्राचा फोटो देखील त्यांनी ट्वीटसोबत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Every1 who is coming to Sindhudurg for Ganesh Chaturthi shud get their Covid test done n show Covid report at the entry point n enter sindhdurg .this shud be done within 48 hrs.Maha Gov shud ensure all the reports r done for free.This will avoid all confusion n avoid the mess! pic.twitter.com/STsHQFAytC
— nitesh rane (@NiteshNRane) July 14, 2020
‘सिंधुदुर्गात गणेश चतुर्थीसाठी येणाऱ्याची प्रत्येकाची इथे येण्याआधीच चाचणी केली जायला हवी. निगेटिव्ह रिपोर्ट दाखवूनच त्याला जिल्ह्यात प्रवेश दिला जावा. येत्या ४८ तासांत हे केलं जावं. यामुळे गोंधळ आणि अडचणी निर्माण होणार नाहीत’, असं नितेश राणेंनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ज्या ठिकाणाहून हे चाकरमानी कोकणात जाण्यासाठी प्रवास सुरू करतील, तिथेच त्यांची कोरोना चाचणी मोफत केली जावी. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला, तरच त्यांना प्रवासाची परवानगी दिली जावी अन्यथा परवानगी नाकारण्यात यावी. असं झालं, तर जिल्ह्याच्या सीमेवर जे पोलीस तैनात आहेत, त्यांच्यावरचा ताण कमी होऊन ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्हचे रिपोर्ट आहेत, त्यांनाच थेट प्रवेश देणं शक्य होईल. शिवाय, पुढे क्वारंटाईन करण्याचा मनस्ताप देखील कमी होईल, असं देखील नितेश राणेंनी या पत्रात म्हटलं आहे.