दिपावलीचा सर्वत्र आनंदोत्सव सुरु असताना खेड तालुक्यात मात्र हत्यांचे सत्र सुरु आहे. पश्चिम भागातील औंढे गावात वृद्ध पती-पत्नीची कोयत्याने डोक्यावर व अंगावर वार करुन निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवसु कुणाजी मुकणे, वय ५५ आणि पत्नी लिलाबाई नवसु मुकणे. वय ५० अशी दोघा पती-पत्नीची नावे आहेत. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील औंढे गावात ३ दिवसांपूर्वी संपूर्ण गाव एकत्र येऊन यात्रेसह दिवाळी उत्सव साजरा करत असताना, अचानक रात्रीच्या सुमारास ७ ते८ जण या दाम्पत्याकडे आले आणि लिलाबाई आणि तिचा पती नवसु याची डोक्यात व अंगावर कोयत्याने वार करून निघृण हत्या केली.
काय घडली घटना?
औंढे गावात कातकरी समाजाचे मुकणे दाम्पत्य रहात होते. बुधवारी रात्रीच्या सुमाराम जेवण करन बसले असताना अचानक ७ ते ८ अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आले आणि लिलाबाई ही गावात जादुटोणा करत असते अशी विचारणा करत दोघांच्या अंगावर, डोक्यात धारदार कोयत्याने वार करत त्यांच्यावर खुनी हल्ला केला. त्यामध्ये दोघा पती-पत्नीचा मृत्यू झाला. राजगुरुनगर पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी करुन ७ ते ८ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून मुकणे दाम्पत्याची हत्या ही जादुटोणा करण्याच्या संशयावरून केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी अधिक तपास करत आहे.
अनैतिक संबध ठेवणारे मोकाटच!
८ दिवसांपूर्वी वाडा गावातही ‘पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या त्रासाला कंटाळून’ पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये पतीला अटक करण्यात आली, मात्र मयत महिलेसोबत अनैतिक संबध असणारे मोकाटच फिरत आहेत. त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? याची खेड तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – फक्त गाडीला कट मारल्याने तरुणाची हत्या