महाराष्ट्रासह मुंबईत या वर्षी तापमानाचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रावर पडलेल्या सूर्याच्या वक्र दृष्टीमुळे गेल्या १५ दिवसांमध्ये अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे. हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघातामुळे औरंगाबादमधील एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे येत्या काही काळात उष्माघातापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला सतर्क राहणं आणि काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, क्षेत्रीय हवामान विभागाने पुढचे ४ दिवस तापमानात अशाच प्रकारे बदल जाणवतील असे सुतोवाच दिले आहेत.
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. मुंबईमध्ये पारा कमी आहे. त्यामुळे तेवढी तापमान जाणवत नाही. पण, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, बीड आणि परभणी इत्यादी शहरांमधील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला आहे. या शहरांमधील गरम हवा जास्त असल्याने लहान मुलं आणि वयोवृद्धांना सर्वात जास्त त्रास होत आहे. शरीरात डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता, सोबतच कडक ऊन असल्याकारणाने शरीरातून निघणाऱ्या घामामुळे इथल्या लोकांना अनेक आजार जडत आहेत.
याविषयी राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, ” राज्यात १५ मार्चे ते ३१ मार्चदरम्यान १५ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यात सर्वात जास्त नागपूरमधील १३ , लातूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी १ व्यक्ती आहे. “
हीट स्ट्रोक म्हणजे काय ?
हवेचे तापमान वाढले की, त्वचेतील छिद्रांद्वारे पाणी बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवले जाते. मात्र काही कारणाने शरीर उत्सर्जित करत असलेल्या उष्णतेचा वेग बाहेरील तापमान शोषून घेण्याच्या वेगापेक्षा कमी झाला की, शरीराचे तापमान वाढत जाते. सर्वसाधारणपणे शरीराचे तापमान ९८ फॅरनहाइट किंवा ३४ अंश से. असते. हे तापमान १०४ फॅरनहाइट किंवा ४० अंश से.च्या पुढे गेले की शरीरातील अवयवांवर परिणाम होण्यास सुरुवात होते. याला उष्माघात म्हणतात. त्यामुळे, योग्य वेळी उपचार केले नाही तर रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो.
हीट स्ट्रोकची कारणे
हीट स्ट्रोक किंवा सन स्ट्रोकचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलं आणि वयोवृद्धांवर होतो. या दोघांनाही स्वत:च्या शरीराचं तापमान नियंत्रण करण्यासाठी खूप वेळ लागतो. उन्हात फिरल्याने किंवा काम केल्याने जर थकवा येत असेल किंवा ताप आला असेल तर उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. याशिवाय त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, भोवळ येणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, मळमळ होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक स्वास्थ नसणे ही देखील उष्माघाताची लक्षणे आहेत.