सध्या राज्यावर करोनाचे संकट असून, दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे यामुळेच जोवर हे संकट दूर होत नाही तोवर रेडीरेकनरचे दर जाहीर होणार नाही असे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटद्वारे सांगितले. राज्य सरकारकडून दरवर्षी मार्च अखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोणाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. यावर्षीचे रेडीरेकनर दर ३१ मार्चला जाहीर होणार नाही.
करोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील असे थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान संपूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याच्या ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म नियोजन सुरू असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊन मध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून जे हार्वेस्टिंग मशीन येथे आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरी ला इंधन दिले जाईल असे थोरात यांनी सांगितले.
एवढेच नाही तर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये अशा आशयाच्या सूचना आम्ही प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.