घरमहाराष्ट्रपाकिस्तानी, बांगलादेशी मुस्लिमांना देशातून हाकला

पाकिस्तानी, बांगलादेशी मुस्लिमांना देशातून हाकला

Subscribe

९ फेब्रुवारीला आझाद मैदानात मनसेचा मोर्चा

राज ठाकरेंचा आता हिंदुत्वाचा अजेंडा

देशात शिरलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशी मुस्लिमांना देशातून हाकललेच पाहिजे. त्यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगतानाच येत्या ९ फेब्रुवारीला या मागणीसाठी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. आपल्या भाषणाची सुरुवातच मुळी, ‘येथे जमलेल्या तमाम हिंदू बांधव, भगिनी आणि मातांनो’, अशा शब्दात करत राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या भविष्यातील वाटचाल ही हिंदुत्त्वाच्या अजेंड्यावर होणार असल्याचे सुचित केले.

 गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या महाअधिवेशनाची सांगता राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली. राज ठाकरे म्हणाले की, देशाच्या इतर भागातून सरळ लोक देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे.

- Advertisement -

यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर, या महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड होत असल्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी देत एकच जल्लोष केला. त्यानंतर दिवसभर मनसेच्या विविध नेत्यांची भाषणे झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी झेंडा आवडला का? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. ते म्हणाले, येत्या 9 मार्चला पक्षाला 24 वर्षे होतील. आम्ही सर्व काही दिवसांपासून विचार करत होतो की पक्षाचे एक अधिवेशन घेणे गरजेचे आहे. सभा ज्यावेळी होते त्यावेळी सर्व एकत्र येतातच. मात्र, अधिवेशन होते तेव्हा राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात वेळ घालवतात. तसंही अधिवेशनाची परंपरा कमी होत आहे.

सर्वच जण उत्तम बोलतात. आपल्यापैकीही अनेकजण उत्तम बोलतात. तुम्ही लोकांनी अधिवेशनासाठी खूप मेहनत घेतली. 9 मार्चला वर्धापनदिन आणि 25 मार्चला आपली गुढी पाडव्याची सभा आहे. मला जे काही अनेक विषय बोलायचे आहेत ते विषय सुरु करण्याआधी मी दोन, तीन संघटनात्मक गोष्टी सांगणार आहे. हे सांगितल्यावर मला तसे पक्षात होताना दिसता कामा नये.

- Advertisement -

मनसे सैनिकांना ताकीद
सोशल मीडिया – फेसबूक, ट्विटर आणि सर्व गोष्टी – काही महाराष्ट्र सैनिक काही संबंध नाही, पण डावा आहे, उजवा आहे काही प्रतिक्रिया व्यक्त करतात. मला संघटनात्मक कोणतीही गोष्ट वाईट पद्धतीने आलेली चालणार नाही. तुम्हाला कुणाबद्दल जर काही भावना व्यक्त करायची असेल तर आम्ही आहोत आम्हाला सांगा.मात्र, पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर चालणार नाही. असं आढळलं तर मी त्या व्यक्तीला पदावरुन दूर करेल. शहराध्यक्ष असो किंवा तालुक्याध्यक्ष अथवा शाखाध्यक्ष असतात. त्यांचं वय सारख असतं, मात्र, पद नावाची एक गोष्ट असते. त्यामुळे पदाचा सन्मान झाला पाहिजे. जे उत्तम काम करता ते लिहा , ते लोकांपर्यंत गेले पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी पत्रकारांनी खूप मदत केली, यापुढेही करतील. मी मध्यंतरी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की यशाला बाप खूप असतात. यश मिळाले की मी केले मी केले सांगतात. त्यात मी नवे वाक्य शोधले, अपयशाला अनेक सल्लागार असतात.

नवा सेल
संघटनात्मक बांधणीसाठी आपण एक सेल सुरु करतो आहे. आत्ता दोन व्यक्तींची निवड होईल. उद्या त्यांच्याखाली तुमच्यापैकी अनेक लोक असतील. संघटनेचं काम करणार्‍यांनी रायगड येथे कार्यालयात येऊन नाव नोंदवावे आणि पक्षासाठी काम करायचं आहे, निवडणूक लढवायची नाही असं सांगावं. बारामतीचे पाटसकर आणि वसंत फडके माझ्याशी बोलून संघटनात्मक काम मजबूत करण्यासाठी ते काम करतील. ते जे काम करणार नाही त्यांचंही नाव माझ्यापर्यंत येईल.

शॅडो कॅबिनेट
पक्षाचे सरचिटणीस आणि त्यांच्या खालील टीम सरकारच्या प्रत्येक महत्त्वाच्या खात्याच्या कामावर देखरेख ठेवतील. या खात्यांचा संपूर्ण राज्यावर परिणाम होत असतो. अगदी आपल्या पक्षाचं सरकार आलं तरी ते लक्ष ठेवतील, असे राज ठाकरे म्हणाले.

पक्षाचा झेंडा का बदला?
मनसे पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता तो हा झेंडा होता. मी माझ्या पहिल्या सभेत सांगितले होते, तेव्हा माझे आजोबा हजर होते. त्या संघटनेला दिलेले नाव देखील माझ्या आजोबांनी दिले होते. तो जो झेंडा होता तो संयुक्त महाराष्ट्र समितीने देखील वापरला होता. त्यानंतर ही समिती विखुरली आणि शिवसेना तयार झाली. पुढे जे काही घडलं ते बाळासाहेब ठाकरेंमुळे घडले. हे सर्व करण्यासाठी जे करावे लागते त्यासाठी माणसे असावी लागतात मी एकटा होतो. तेव्हा मनसे स्थापन करताना मागे कोणी नव्हते सांगायला कोणी नव्हते. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. हा रंग घ्या तो घ्या, सोशल इंजिनिअरींग करणे म्हणतात त्याला. तेव्हापासून माझ्या डोक्यात हा झेंडा होता. अनेकांना वाटतात आत्ताच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा झेंडा आणला. मात्र हा केवळ योगायोग आहे. हा मुळ डीएनए आहे. तो झेंडा आणायचाच होता. मात्र, कसा आणायचा हा विचार करताना पक्षाच्या अधिवेशनात हा झेंडा आणण्याचे ठरवले.

निवडणुकीत हा झेंडा वापरायचा नाही
एक गोष्ट सांगतो ही महाराजांची राजमुद्रा आहे. दुसरा कोणता झेंडा नाही. तो जेव्हा हातात घ्याल, तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसायला नको. आपले दोन झेंडे आहेत. निवडणुकीच्यावेळी हा झेंडा वापरायचा नाही. त्या राजमुद्रेचा मान राखलाच पाहिजे. त्याचा कुठेही गोंधळ व्हायला नको. झेंडे बदलले आहेत. मनसे पहिल्यांदा करते आहे असं नाही. जनसंघाने झेंडा आणि नाव बदलूून भाजप केलं. त्याआधीचंही उदाहरण आहे.

मी मराठी आणि हिंदूही
मराठीत आपण बोलतो कात टाकावी लागते, नवी उर्जा द्यावी लागते. कोणत्याही सकारात्मक गोष्टीसाठी बदल आवश्यक असतो. मग मराठीचे काय होणार? मी एक गोष्ट आजच सांगून ठेवतो. परंतू मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मातरण केलेले नाही. मी आज बोलत नाही. माझे 14 वर्षांतील भाषणे काढून पाहा. माझ्या मराठीला नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि माझ्या धर्माला नख लावलं तर हिंदू म्हणून अंगावर जाईल.

कलाम, झहीर खान आमचेच
येथे सकाळी जरी गोंधळ झाला असला तरी मी स्पष्ट आहे. मी मागील काही दिवसांपासून वाचतो आहे. जे देशाशी प्रामाणिक आहेत ते मुस्लिम आमचेच आहे. आम्ही एपीजे अब्दूल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांच्यासारख्या लोकांना विसरू शकत नाही. ते आमचेच आहे. जावेद अख्तर यांची मुलाखत पाहिली त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. उर्दू भाषा ही कधीच मुस्लिमांची भाषा नव्हती. म्हणूनच बांग्लादेशाने भाषेच्या मुद्द्यावर वेगळा देशा मागितला. भाषा कोणत्याही धर्माची नसते. हे मला सरसकट मान्य नाही. आझाद मैदानावर रझा अकादमीच्या लोकांनी पोलीस भगिणींवर हात टाकला तेव्हा या राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

नमाज का त्रास देतोय?
भारतात कलाकार राहिले नव्हते असं समजत पाकिस्तानी कलाकारांना भारतात आणले तेव्हा त्यांन हाकलणारे मनसेचे कार्यकर्ते होते. तेव्हा कुणी नाही म्हणाले की हिंदूत्वाकडे जात आहात. धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय? नमाज का पढता असे आम्ही म्हणत नाही. भोंगा लावून का नमाज करतात? किती बांग्लादेशी भारतात आले याचा काहीच अंदाज नाही. हे बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावा असे अनेक वर्षांपासून सांगतो आहे. तेव्हा कुणी नाही म्हणाले, हिंदुत्वाकडे जात आहात? असे राज ठाकरे म्हणाले.

समझोता एक्स्प्रेस बंद करा
आम्हाला आमचा मार्ग माहिती आहे. भारत काय धर्मशाळा नाही. कुणीही येथे यावं आणि येथे राहावं. अडीच हजार रुपये दिले तर भारतात येता येतं. पाकिस्तानचे नेपाळमार्गे येत आहेत. माझं केंद्र सरकारला सांगणं आहे. तुम्ही पहिल्यांदा समझोता एक्स्प्रेस बंद करा.

पोलिसांना 48 तास द्या
काश्मीर, राम मंदिर विषयावर मी कौतुक केले. मात्र, आज ज्या गोष्टी होत आहेत. जे बाहेरुन आले आहेत त्यांना का पोसायचं? या लोकांची आपल्या पोलिसांकडे आहे. माझा मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर इतका विश्वास आहे, की त्यांना एकदा 48 तासांचा वेळ द्या बघा ते काय करुन ठेवतात.

मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो
अचानक देशात मोर्चे निघायला लागले, मुस्लीम रस्त्यावर उतरले. मला काहींनी सांगितलं की त्यांना काश्मीर, राम मंदिराचा राग आहे. त्याचा एकत्रित राग आत्ता बाहेर येत आहे. ते जर बाहेरच्या मुस्लिमांसोबत उभे राहत असतील तर आम्ही त्यांना का साथ द्यावी. अनेक जण म्हणतात राज ठाकरेचा रंग बदलला का? मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही.

मोठे कारस्थान सुरू आहे
माझ्याकडे काही माहिती आली आहे. महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जेथे अनेक बाहेरच्या देशातील मौलवी येतात, तेथे पोलिसांनी जायलाही परवानगी नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की हे मोठं कारस्थान घडवण्याचं काम सुरु आहे. ही माहिती मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून देणार आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभं राहावं, हे मी त्यांना भेटून सांगणार आहे.

९ फेब्रुवारीला मोर्चा
मागे जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्या सर्व 25 मार्चला टराटरा फाडणार आहे. पण आत्ता अनेक मोर्चे निघत आहेत, त्या मोर्चांना उत्तर जाणं गरजेचं आहे. मोर्चाला उत्तर मोर्चाने, म्हणून 9 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढेल, त्या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

अमित ठाकरेंच्या नेतेपदाची घोषणा

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मनसे नेतेपदाची घोषणा करण्यात आली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली. त्यावेळी अमित ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी मला ठरावा संदर्भात माहिती दिली. तसेच शिक्षण विषय ठराव मी मांडायचा असे सांगितले. ते ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मनसेच्या प्रत्येक नेता, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे, तो यापुढेही द्याल, अशी अपेक्षा करतो. महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचा शाल आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

आई म्हणून माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा अमितच्या सोबत कायम आहेत. आजच्या क्षणाची आम्ही सगळेच वाट पाहत होतो. आम्ही हे सगळं केवळ मीडियातच ऐकत होतो. कारण आम्हाला कुणीही याबद्दल आधी कल्पना दिली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात हा क्षण पाहून माझ्या अंगावर काटा आला. मन भरून आले. अमितची कुणाशीही तुलना करण्याची गरज नाही. त्याने समाजासाठी चांगले काम करणे जास्त महत्त्वाचे आहे. -शर्मिला ठाकरे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -