९ ऑगस्ट २०१२ रोजी झालेल्या अॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरणामधील आरोपीच्या शिक्षेत न्यायालयानं पाच वर्षांची वाढ केली आहे. अॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरणातील आरोपी सज्जाद मुघलनं पळ काढण्यासाठी पॅरोलचा आधार घेतला होता. हे सिद्ध झाल्यानं नाशिक न्यायालयानं त्याची शिक्षा पाच वर्षानं वाढवली आहे. शिवाय, त्याला ५ हजारांचा दंड देखील ठोठवला आहे. मुंबईतील वडाळ्यामध्ये अॅड. पल्लवी पूरकायस्थची ९ ऑगस्ट २०१२ रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणामध्ये इमारतीचा सुरक्षा रक्षक सज्जाद मुघलला अटक केली होती. त्यानंतर त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. फेब्रुवारी २०१६मध्ये सज्जाद मुघल ३० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर पडला. पण, त्यानंतर सज्जाद कारागृहात आलाच नाही. २७ मार्च रोजी सज्जाद कारागृहात येणं अपेक्षित होतं. पण, तो पसार झाल्याचं कळताच रागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आलं. शिवाय प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले. त्यानंतर हत्येतील आरोपींना पॅरोल मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला. अखेर सज्जाद मुघलला काश्मीरमधून अटक करण्यात आली. यानंतर सज्जाद मुघलच्या शिक्षेमध्ये न्यायालयानं ५ वर्षांची वाढ केली. तसेच त्याला ५ हजारांचा दंड देखील ठोठावला.