भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त गोपीनाथ गड येथे शक्तीप्रदर्शन करत आहेत. परळी विधानसभेत पराभव आणि राज्याच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आता उघड बंड सुरु केल्याचे दिसते. नुकताच त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत एक खळबळजनक आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची तिकीटे कापण्यात आली होती. दिल्लीतून निर्णय घेतल्याचे या नेत्यांना सांगण्यात आले होते. मात्र हा निर्णय दिल्ली नाही तर राज्यातील नेतृत्वानेच घेतला होता, असा आरोप पकंज मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
Decision to deny tickets taken in Maharashtra, not in Delhi; Devendra Fadnavis should take responsibility for party's poll performance: BJP leader Pankaja Munde
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2019
पीटीआय या वृत्तसंस्थेने याबद्दल ट्विट केले आहे. पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाल्यापासून त्या नाराज आहेत. २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोन दिवसातच राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि भाजपचे इतर नेते उघड नाराजी व्यक्त करु लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांनी नाराज पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पंकजा यांनी आपल्या नाराजीचे कारण समजू दिले नव्हते. मात्र पीटीआयला दिलेल्या माहितीनूसार त्यांनी विधानसभेच भाजपच्या कमी झालेल्या जागांबद्दल देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे.
भाजपने या वरिष्ठ नेत्यांचे तिकीट कापले
विधानसभा निवडणुकीआधी तिकीट वाटप करत असताना भाजप पक्षनेतृत्वांना अनेकांना धक्के दिले होते. माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, विष्णू सवरा, प्रकाश मेहता, दिलीप कांबळे, माजी प्रतोद प्रकाश मेहता यांची तिकीटे कापल्यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र हा निर्णय भाजपच्या दिल्लीतील संसदीय समितीचा असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या आरोपानंतर हा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आज (दि. १२ डिसेंबर) गोपीनाथ गडावर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.