केंद्र शासनाच्या नवीन सूचनेनुसार चीनसह हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द.कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशातील प्रवाशांसोबतच इराण आणि इटलीतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, २५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ४४१ विमानांमधील ५३ हजार ९८१ प्रवासी तपासण्यात आले आहेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ३०४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी, २२५ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ९१ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी, ८८ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. सध्या एक जण पुणे येथे तर दोघे मुंबईत दाखल आहे. राज्यात एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.