महत्त्वाच्या पक्षांबरोबर इतर अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्याची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मते विभागली जात आहेत. उमेदवार म्हणून उभा रहाणारा नेता सुरवातीला समाजसुधारक, कर्तव्यदक्ष, सामाजिक जाण असलेला वाटतो आणि त्याप्रमाणे त्याला मतेही दिली जातात. पण प्रत्यक्षात तो जेव्हा विजयी होतो, त्यावेळी तो आपली वेगळीच वृत्ती दाखवायला लागतो. गरीब असणारा हा उमेदवार पुढे श्रीमंत होतो.
पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आपली कार्यपद्धती आखत असतो. त्यामुळे मतदार नाराज होतात. आज राजकारणात येऊ पहाणारे उमेदवार लक्षात घेतले तर राजकारण हा व्यवसायाच झाला आहे का असे वाटायला लागते. देश स्वतंत्र होण्यापूर्वी संस्थाने कार्यरत होती. कालांतराने ती खालसा झाली असली तरी पक्षाच्या रुपाने पुन्हा संस्थाने अस्तित्त्वात आहेत की काय असे वाटू लागलेले आहे.
जी आश्वासने दिली जातात, ती उमेदवाराकडून पूर्ण होत नाहीत. परिणामी सामान्य माणूस मतदान करायला बाहेर पडत नाही. केबलच्या निमित्ताने रस्त्त्यांचे होणारे खोदकाम प्रत्येकवर्षी त्रासदायक असते. नियोजन करुन कायमस्वरुपी हे काम का होत नाही हा प्रश्न मला प्रत्येकवर्षी पडत असतो. रस्ते सुधारा पण त्यापूर्वी पर्यायी मार्गांची प्रथम तयारी करा. एकदा रस्ता दुरुस्त केल्यानंतर पावसाळ्यात खड्डे पडण्याची उदाहरणेही तितकीच आहेत.