‘मावळ लोकसभा मतदार संघाला दाखवून द्यायचं आहे की, आम्ही कोणाचे गुलाम नाहीत आणि धरणामध्ये लघुशंका करणाऱ्यांचे तर नाहीतच’, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ‘मावळमध्ये चॉकलेट पर्व सुरू आहे. चॉकलेट कोणाला दिलं? त्याचं चारित्र्य काय?’, अशाप्रकारचे प्रश्न विचारत आंबेडकर यांनी मावळ मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर घणाघात केला. ते रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘निवडणूक म्हणजे थट्टा मस्करी सुरू आहे. नातवाचे लाड पुरवले जाण्याचे साधन निवडणूक बनली आहे. आम्ही सर्व महाराष्ट्र मुठीमध्ये ठेवलेला आहे. मावळ मतदार संघ हा चॅलेंजिंग मतदार संघ आहे. येथे राजकीय पक्षाला चॅलेंज नाही तर येथील मतदारांना चॅलेंज आहे. मावळ लोकसभा मतदार संघाला दाखवून द्यायचं आहे की, आम्ही कोणाचे गुलाम नाहीत आणि धरणात मुतणाऱ्यांचे तर नाहीच. सत्ता दिली लोकांचं भलं करण्यासाठी, मात्र त्यांना मग्रुरी आली. त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. तुम्ही आमचे मालक नाहीत, आम्ही तुमचे मालक आहोत. आम्ही जे सांगू ते तुम्ही केलं पाहिजे.’
यापुढे आंबेडकर म्हणाले की, ‘मावळ लोकसभा मतदार संघात चॉकलेट पर्व वापरलं जात आहे. उमेदवारी कोणाली दिली? ज्याचं रेव्ह पार्ट्याच चारित्र्य आहे. उद्याची सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी होणार आहे का? व्यसनाधीन करणाऱ्यांच्या हाती सत्ता देणार आहात का? अमेरिकेत राष्ट्रपतीच्या निवडणुकीत चारित्र्याचे कागदपत्र मागितली जातात. तो चारित्र्यवान आहे का हे पाहिलं जातं. तसं येथील उमेदवार या निकषावर उतरतात का?’