यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट कीटक नाशके बनवून त्या कीटनाशकांची विक्री देखील जाते. याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य वजाहत मिर्झा यांनी मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते.
१७ कृषी सेवा विक्री केंद्राचे परवाने रद्द
यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये आढळून आलेल्या गंभीर उणिवा आणि त्रुटींच्या अनुषंगाने त्यांची बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके विक्रीचा परवाना ५ नोव्हेंबर पासून प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी रद्द केलेला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दराने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हास्तरावर १ आणि तालुकास्तरावर १६ अशा एकूण १७ भरारी पथके आणि तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशके विक्री केंद्रे तपासणीमध्ये आढळून आलेल्या उणिवा आणि त्रुटींच्या अनुषंगाने ८६ प्रकरणात विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत. तसेच १७ कृषी सेवा विक्री केंद्राचे परवाने रद्द आणि निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गुणनियंत्रक निरिक्षकांमार्फत आणि भरारी पथकामार्फत यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, कळंब, पांढरकवडा आणि नेर या तालुक्यामध्ये कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करुन आणि धाडी टाकून कार्यवाही करण्यात आलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारणाकरिता टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.