रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळी पासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दीड हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले होते. खुद्द पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहरातील अनेक ठिकाणी सुरक्षेविषयी पाहणी केली आहे.
पोलिसांचा फौज फाटा शहरात तैनात
गेल्या काही वर्षांपासूनचा सर्वात महत्वाचा रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तर सर्व स्थरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून शांततेचे आवाहन देखील करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा शहरात तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी लालटोपी नगर, मोरवाडी मशीद, नेहरू नगर, पिंपरी पूल, काळेवाडी येथील मशीद, दापोडी मशीद, भोसरी चक्रपाणी वसाहत, कुदळवाडी, रूपीनगर, ओटा स्कीम, वाल्हेकरवाडी या ठिकाणी जाऊन सुरक्षेविषयी पाहणी केली.
शहरात सर्वत्र शांतता आहे, सगळ्यांना आवाहन आहे की शांतता ठेवावी. जिथे शांतता नांदते तिथे विकास होतो. जिथे शांततेचा भंग होतो तिथे देशाच आणि नागरिकांचं नुकसान होत. दीड हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर गस्त घालत आहेत. एसआरपीएफ (SRPF) ची कंपनी आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात शांतता बैठकीच आयोजन करण्यात आले होते. फेसबुक, व्हाट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नका. त्याच्यावर आमची नजर आहे जो अशा पद्धतीचे कृत्य करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अस त्यांनी ठणकाहून सांगितले आहे.
हेही वाचा – Ayodhya Verdict : व्हॉट्सअॅप ग्रुप झाले सतर्क आणि केली ‘ही’ गोष्ट