गेल्या वर्षभरामध्ये वारंवार होणारे हवामानातील बदल आपण सगळ्यांनीच पाहिले. आताही हवामान खात्याच्या अंदाजामुळे बळीराजाची धाकधूक आणखी वाढली आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीला सुरुवात झाली आहे. पण पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
आताही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला. अशा अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. हेच वातावरण पुढचे काही दिवस असणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे.
सोमवारी मुंबई, नवी मुंबई, सांताक्रुझ परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात सोमवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी दिल्लीत हलक्या सरींचा पाऊस झाला. पावसामुळे दिल्लीत धुरके नाही, परंतु थंडी वाढली आहे. दिल्लीत पहाटे 11.30 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पाऊस पडला. हवामान खात्याच्या माहितीनुसार दिल्लीतील सफदरजंग भागात 6.6 मिमी, पालममध्ये 1.5 मिमी, लोधी रोडला 8 मिमी आणि आयनगरमध्ये 6 मिमी पाऊस पडला.