राजू शेट्टी यांनी उसाला दर मिळावा म्हणून आंदोलन करण्यापेक्षा साखरेला दर मिळावा यासाठी आंदोलन करावे, असा सल्ला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी लढे यांची मोठी परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आजवर शेकाप लढतोय आणि लढत राहील. राजू शेट्टी नेहमीच ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा यासाठी संघर्ष करतात. त्यांची मागणी रास्त आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
साखरेच्या दरात सतत चढउतार
शेतकऱ्यांना एफ. आर. पी. प्रमाणे दर मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मात्र साखरेला जर दर मिळाला नाही तर उसाला कसा दर मिळणार? ऊस दराचं मूळ हे साखरेत आहे. साखरेच्या दरात सतत चढउतार होत असतो. त्याचा परिणाम साखर उद्योगावर होतो. त्यामुळे उसाला दर देणे शक्य होत नाही. उसाला दर द्या, अशी मागणी करताना साखरेचा दर वाढवा, अशी मागणी शेट्टींनी केली, तर ऊस दराचा प्रश्न सुटेल, असेही पाटील म्हणाले.
राबणाऱ्या शेतकऱ्याला छळू नका
ऊसतोड रोखणे हा काही आंदोलनाचा मार्ग नाही, तुम्ही तुमच्याच एका शेतकरी बांधवांचा ऊस रस्त्यावर अडवून त्याच नुकसान करताय त्यापेक्षा उसाचे गाळप होवू द्या, तुम्ही राबणाऱ्या शेतकऱ्याला छळू नका. शेतकऱ्याला वेठीस धरण्यापेक्षा सरकारशी दरासाठी भांडा, आम्हीसोबत आहोत, असेही पाटील यांनी सुचविले.