मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून पाड्लायमुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. आता भाजपचे नेते आणि छत्रपती शिवरायांचे वशंज उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील आपला राग व्यक्त केला आहे. दोन्ही राजेंनी ट्विटरवर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला आहे.
छिंदवाडा येथे जेसीबी लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडत असल्याचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर लगेचच शिवप्रेमींनी आंदोलन करत पुन्हा तिथेच शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान केला होता. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्या सर्व शिवप्रेमींचे आभार व्यक्त केले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे JCB ने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे.”, अशी मागणी
संपूर्ण देशाचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील स्मारक JCB ने काढण्यात आले. ज्याप्रकारे स्मारक हलवण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 13, 2020
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडिओ पाहून मन हेलावून गेलं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. “मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने आणि पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा, जनाक्रोश एवढा जास्त आहे की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही”, असे ट्विट खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.
हे वाचा – Video: बुलडोझरने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा.
जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. @RahulGandhi @OfficeOfKNath— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 13, 2020
मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. अशा क्रूर पद्धतीने पुतळा हटवून तुम्ही नेमके काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही, असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.