अलिबाग-हाशिवरे मार्गे रेवस असा प्रवास करताना बेलपाडा ते सारळ पूल आणि पुढे रेवस धक्क्यापर्यंत खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावर मलमपट्टी करण्याचे सौजन्य बांधकाम खात्याने दाखविलेले नाही. त्यामुळे या खात्याच्या नाकर्तेपणाला कंटाळून अखेर येथील रिक्षाचालकांना घमेल, फावडे हाती घेऊन खड्डे भरावे लागले.
अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची समस्या हा संपणारा विषय झाला आहे. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. जूनच्या दुसर्या आठवड्यापर्यंत रस्ते दुरूस्तीसाठी बांधकाम खात्याकडे अवधी होता. एरव्ही नियम डावळून आणि मुदतीनंतरही रस्त्याची कामे सुरू असल्याचे पहायला मिळते.
मात्र हाशिवरे-रेवस मार्गावरील रस्त्याचे काम अर्धवट असताना पूर्ण झाल्याचे लेबल चिकटवून या रस्त्याकडे बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याचे दिसते. बेलपाडा गावापासून पुढे सारळ पुलापर्यंत प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. पादचार्यांनाही खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतो.अखेर दुर्लक्षित खड्ड्यांवर मलमपट्टी करण्यासाठी रेवस येथील रिक्षाचालकांनी पुढाकार घेतला. त्यांनी नाक्यावर पडलेले खड्डे भरले. आता सारळ पुलापर्यंतचे खड्डे कोण भरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.