देशाच्या पंचायतराज व्यवस्थेत गाव हा महत्त्वपूर्ण घटक आहे. तसेच ग्राम विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरात आयोजित सरपंच सम्राट अॅग्रीटेक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रिय परिवहनमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, पंचायतराज व्यवस्थेत गाव व ग्रामपंचायत हे महत्त्वाचे घटक असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच गावाला एकत्रित ठेवतात, यासाठी त्यांचे मोलाचे योगदान ठरते. गावाच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणारे सरपंच हे ग्रामविकासाचे खरेखुरे दूत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
While speaking CM @Dev_Fadnavis said, Sarpanch’s is the most important role in Panchayat Raj system. They are the real heroes in the process of village development. And I am confident that in future they will contribute much more, he said. pic.twitter.com/YzAeAwccax
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2019
राज्यातील १६ हजार गावांना जलयुक्त शिवारचा लाभ
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की,”जलयुक्त शिवार अभियानाला लोकसहभागाची जोड मिळाल्यामुळे ही लोकचळवळ बनली. याद्वारे १६ हजार गावे जलसमृद्ध झाली आहेत. यामुळे दुष्काळी स्थितीवर मात करता येणे शक्य झाले आहे. गावा-गावांतील टॅंकरची संख्या कमी झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गंत गावकऱ्यांनी ही किमया करून दाखवली आहे. मागील वर्षी ८३ टक्के पर्जन्यमानावरही विक्रमी उत्पादन घेणे हे केवळ आश्वासित सिंचनक्षमता वाढल्यामुळेच शक्य झाले. त्यामुळे बागायती क्षेत्रही वाढते आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गंत ३५ हजार तलाव गाळमुक्त करण्यात येत आहेत. हा गाळ शेतशिवारात टाकल्याने जमिनीची सुपिकता आणि धरणांची साठवणक्षमता वाढणार आहे. दीड लाख शेततळी तसेच सिंचन विहिरींच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सहा लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यातआल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.