घरदेश-विदेशसावरकरांवरून विधानसभेत हंगामा

सावरकरांवरून विधानसभेत हंगामा

Subscribe

सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का दिले नाही?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न द्या ही शिवसेनेचीही मागणी आहे. राज्य सरकारच्यावतीने माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दोन वेळा पाठवला आहे. केंद्रात अजूनही भाजपचेच सरकार असूनही भारतरत्न देण्यासाठी एवढा उशीर का, असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केला. सावरकरांच्या स्मृतिदिनी राजकीय स्वार्थ साधण्यापेक्षा आधी सावरकरांना भारतरत्न द्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तुमच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही आणतो, असे सत्ताधार्‍यांनी विरोधकांना सुनावले. मात्र, स्वा.सावरकरांच्या अपमानावरून विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी करत कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांच्या अडथळ्यांना न जुमानता या गोंधळातही सभागृहाचे दिवसभराचे कामकाज पूर्ण केले. त्यामुळे सभागृह बंद पाडण्यात विरोधक आज सपशेल अपयशी पडल्याचे दिसून आले. विधानसभेचे तिसर्‍या दिवसाच्या कामकाजातील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व स्थगनचे प्रस्ताव फेटाळले. यावेळी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकराच्च्या गौरव प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. मात्र, ही स्थगनची सूचना होऊ शकत नसल्याचे सांगत अध्यक्षांनी मुनगंटीवार यांना प्रस्ताव वाचून दाखविण्यास सांगितले.

- Advertisement -

मात्र, या प्रस्तावात मुनगंटीवार यांनी असे काही लोक आहेत की त्यांच्या देहावर दुसर्‍यांच्या मेंदूचे नियंत्रण आहे, असे लोक सावरकरांविषयी अवमानजनक वक्तव्य करीत असल्याने हा प्रस्ताव आणण्यात आल्याचे सांगताच अध्यक्षांनी ही स्थगनची सूचना होऊ शकत नाही, असे सांगत स्थगन प्रस्ताव फेटाळला. यालाच दुजोरा देत छगन भुजबळ यांनी नियमांचे पुस्तक वाचून दाखवत सभागृहात अपमानास्पद वक्तव्य करता येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

एकीकडे भाजप सदस्यांकडून गौरव प्रस्तावाचे राजकारण केले जात असताना याला संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी जोरदार आक्षेप घेतला. अध्यक्षांनी प्रस्तावाची तापसणी करून यावर निर्णय द्यावा. त्याचप्रमाणे प्रस्तावावर नितेश राणे यांचेही मत जाणून घ्यावे, असे सांगतानाच शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी केली आहे. तेव्हा आधी सावरकरांना भारतरत्न द्या, भारतरत्न दिल्यानंतर आम्ही तुमचेआणि मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असा जोरदार टोला अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप सदस्यांना लगावला.

- Advertisement -

भाजपाला नेमका कोणता स्वार्थ साधायचा आहे?
अजित पवार पुढे म्हणाले की आपल्या सभागृहाचे कामकाज प्रथेनुसार चालते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतीदिन आजच आला आहे असे नाही. यापूर्वीही त्यांचा स्मृतीदिन येऊन गेला आहे. त्यामुळे मी वीर सावरकरांना आदरांजली वाहतो. त्यांच्या कामाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु सुधीर मुनगंटीवार व इतर नेत्यांना नेमके काय राजकारण करायचे आहे की कोणता स्वार्थ साधायचा आहे, हेच कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला. वीर सावरकरांचे योगदान कोणी विसरू शकत नाही. मात्र त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे विचार होते. बैल, गायीविषयी त्यांचे विचार काय होते ते सर्वांना माहीत आहे. तेव्हा आधी देशाच्या पंतप्रधानांना प्रस्ताव पाठवलाय त्यानुसार सावरकरांना भारतरत्न मिळायला हवे.
, ही आमचीही मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले.

सावरकरांच्या अवमानाचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील
शिदोरी मासिकातील सावकरांविषयीचा मजकूर फडणवीस यांच्याकडून वारंवार वाचून दाखवण्यात येत होता. याला जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. शिदोरीतील मजकूर वाचून दाखवत विरोधी पक्षनेते सावरकरांचा अवमान करीत आहेत. भारतरत्नसारखा सन्मान देण्याचा विचार करता आणि त्यांच्याविषयी सभागृहात वाईट वाचून दाखवता हे योग्य नाही. अशा गोष्टी करून भाजपकडून सावरकरांचा अपमान होत असल्याचे सांगून हे थांबविण्याची मागणी जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.

काँग्रेसच्या ‘शिदोरी’वर बंदी घाला -देवेंद्र फडणवीस
काँग्रेसच्या शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमानजनक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ‘शिदोरी’वर बंदी घाला अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे सावरकरांचा गौरवाचा ठराव मांडावा अशी मागणी केली. मुनगंटीवार यांनीही गौरव प्रस्तावावर चर्चा न घेता दोन ओळीचा ठराव मांडावा अशी मागणी केली.

सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का दिले नाही? -अजित पवार
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सुरू असलेल्या राजकारणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा पत्र लिहून वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती. परंतु यामध्ये नेमकी काय अडचण आली याचे उत्तर मिळाले पाहिजे. वीर सावरकरांना भारतरत्न मिळावे अशी आमचीही मागणी आहे. राज्य सरकारकडून अपेक्षा करता मग तुम्ही सत्तेत असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -