भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संघावर खळबळजनक आरोप केला आहे. सामान्य माणसांना मिळू शकत नाहीत, अशी हत्यारे संघाकडे आहेत. आर्म्स अॅक्ट अंतर्गत सामान्य माणूस पोलिसांच्या परवानगीने फक्त पिस्तूल बाळगू शकतो. संघाकडे स्वयंचलित बंदुका, डबल बॅरल फायर सारखी अत्याधुनिक हत्यारे आली कुठून? ज्या ज्या ठिकाणी संघाचे कार्यालय आहेत, तिथे तिथे ही हत्यारे आहेत. ही हत्यारे कुणाविरुद्ध वापरली जाणार आहेत? असा प्रश्न उपस्थित करत आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी या हत्याराच्या विरोधात कारवाई केली नाही. आताचे सरकारही यावर कारवाई करत नाही, संघाची हत्यारे जप्त केली नाहीत तर सत्तेतून पायउतार होताना संघाकडून मोठा नरसंहार होण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
सरसंघचालक मोहन भागवत आणि संघावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करावी. संघाचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून मोर्चा काढू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आला. | #MyMahanagar @Prksh_Ambedkar @Mohanbhagwat13 @RSSorg pic.twitter.com/YuStu2hrMi
— My Mahanagar (@mymahanagar) October 11, 2018
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेली शस्त्र जप्त करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. भारिप बहुजन महासंघ पक्षाच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर आंदोलन करण्यात आले. संघाने आपली वेगळी सेना का तयार केली आहे? तसेच या सेनेकडे शस्त्र का आहेत? असा सवाल यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. पोलिसांनी मोहन भागवत आणि संघावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
हे वाचा – रा. स्व. संघ हिंदूंसाठी नव्हे – संजय सोनवणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शस्त्रांची पूजा कशी काय करतात? पोलिसांनी खबरदारी घेत यावर कारवाई करायला हवी. सत्ता गेली तर ही हत्यारे पोलिसांवरच रोखली जातील, अशी भीती देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. जर संघाने जमा केलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून मोर्चा काढू, असा इशारा यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आला आहे.