शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतत असताना सेनेचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी मातोश्रीवर उपस्थित नव्हते. त्यांना बोलाविण्यात आले नव्हते असे समजते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या पाच नगरसेवकांनी लेखी पत्र ठाकरे यांना दिले असून त्यात औटी यांच्याबाबत तक्रार केली असल्याचे समजते. मात्र, हे पत्र माध्यमांसमोर उघड करण्यात आलेले नाही.
पारनेरचा पाणीप्रश्न आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सोडविला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. पाच नगरसेवकांना शिवबंधन बांधल्यानंतर ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसे शिवसेनेच्या मुखपत्रातही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे पारनेर तालुक्याचे नेतृत्व आमदार निलेश लंके यांच्याकडे सोपविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निलेश लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. मात्र, विजय औटी यांच्यासोबत मतभेद झाल्याने ते सेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले. ‘सेनेत असताना आपणाला कधीही मातोश्रीवर येता आले नाही. दोन दशकांनंतर बुधवारी ही संधी आपणाला मिळाली’, अशी भावना आमदार लंके यांनी व्यक्त केली आहे. औटी यांना मातोश्रीचा निरोपच नाही?