करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात कमी होण्याचे नाव घेत नसून नागरिकांच्या चिंतेत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन आणि महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज सकाळी ११ वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
नागरिकांची भीती घालविण्यासाठी येणार लाईव्ह
लोकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी, या दृष्टीने हा संवाद असणार आहे. राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा आणि सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर शरद पवार हे जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२५ च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेकांच्या मनात भीतीचे सावट पसरले आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, असे आवाहन दररोज केलं जातं आहे. तसेच महाराष्ट्रातील जनता त्याचं पालनही करताना दिसून येत आहे. परंतु, नागरिकांच्या मनातली भीती मात्र कायम आहे. ही भीती घालवण्यासाठीच शरद पवार हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
शरद पवार यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय?
कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर उभ्या ठाकलेल्या महाभयानक आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा अनेक आव्हानांबाबत Sharad Pawar या माझ्या फेसबुक पेजवरून शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता आपल्याशी संवाद साधणार आहे.