घरCORONA UPDATEशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार!

शिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार!

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबईतील खासगी दवाखाने वारंवार सांगूनही आपले दरवाजे उघडत नाहीत. यामुळे करोना सोडून इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या मुंबईकर नागरिकांना दवाखान्यांसाठी दारोदारी फिरावे लागते. सर्वांना कायद्याचा बडगा दाखवून चालत नाही आणि माणुसकी दाखवली पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी तरुण शाखा शाखांमधून मोठ्या संख्येने आपली नोंद करत समाजकार्याला स्वतःला वाहून घेत होते, आता त्याच धर्तीवर शिवसेना शाखा या खासगी दवाखाने करण्यात येणार असून यासाठी लवकरच शाखाप्रमुख यांना आदेश देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

संकटाच्या काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक हा कायम पुढे असतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून शिवसेनेच्या शाखांमध्ये तात्पुरते दवाखाने तुम्हाला कार्यरत दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतीत निवडक संपादकांच्या चर्चेत व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, दादर (जुना महापौर बंगला) येथे सुमारे तासभर झालेल्या चर्चेत करोनाबाबतच्या उपाययोजना आणि राज्य सरकारची तयारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी, विकास खरगे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, माहिती संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरूद्ध अष्टपुत्रे, शिवसेेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान उपस्थित होते.

- Advertisement -

रुग्णसंख्या ६० हजारांपर्यंत रोखण्यात यश

३१ मे नंतर लॉकडाऊनचे काय अशी विचारणा केली असता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना या शनिवारी कळणार आहेत. त्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत रेड झोन नाही तेथे शिथिलता दिली जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईत आलेल्या केंद्रीय पथकाने मे महिन्याच्या अखेरीस एक लाख रुग्ण संख्या होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यांचा अंदाज काही अंशी बरोबर होता, त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना सुरू केल्या, मात्र मुंबई महापालिका, राज्यातील निवडक महापालिका, जिल्हाधिकारी आणि आरोग्य खात्याच्या कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम कामांमुळे मुंबईची रुग्ण संख्या ४० हजार आणि राज्याची रुग्ण संख्या ६० हजार पर्यंत रोखण्यात आपल्याला यश आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आता खरे आव्हान पावसाळ्यात असून सर्दी, खोकला, ताप असे आजार उन्हाळ्यामुळे बळावलेले नाहीत. मात्र पावसाळ्यात हे आजार येणार नाहीत याची खात्री कोणी देणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेत तसेच करोनाची काही लक्षणे दिसत असतील तर लगेच महापालिका आणि आरोग खात्याशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

लोकांमध्ये भिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या

महापालिका आणि राज्य सरकार करोना रोखण्यासाठी रात्रं-दिवस चांगले काम करत असून लोकांमध्ये भीती निर्माण होणार नाही याची काळजी प्रसार माध्यमांनी घ्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. उपाययोजना करत असताना प्रचंड संख्येने असलेल्या रुग्णांमुळे काही ठिकाणी हेळसांड होत आहे. माझ्याकडे तक्रारी आणि व्हिडिओ येतात. मात्र प्रसार माध्यामांनी ते व्हिडिओ अपलोड न करता संबंधित अधिकार्‍यांना आणि प्रशासकीय यंत्रणांना पाठवल्यानंतर आम्ही त्यावर काही कार्यवाही केली नाही तर ते व्हिडिओ नक्की दाखवा. मात्र यंत्रणांकडे कोणतीही माहिती न दिल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते. मुंबई आणि राज्याची परिस्थिती रुळावर आणण्यासाठी मला प्रसार माध्यमांची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -