भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी त्यांना खुले प्रतिआव्हान दिले आहे. ‘३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत आहेत,’ असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावर शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी ‘पुरावे सादर करा नाहीतर तोंड काळं करा!’, असे प्रतिआव्हान किरीट सोमय्यांना केले आहे. ‘ना घर का, ना घाट का’, अशी सोमय्यांची अवस्था झाल्याचे वायकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.
‘आपलं महानगर’शी बोलते वेळी शिवसेना नेते वायकर यांनी सांगितले की, मुरुड येथील कोलई गावात जमिनी खरेदी झाली होती. हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात याचा उल्लेख केलेला आहे. आयकर विभागाला देखील याचा दस्ताऐवज दिला आहे. याशिवाय या प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत चौकशी झालेली आहे. विरोधकांना आणखी चौकशी करायची असेल तर ते करू शकतात असे आव्हान वायकर यांनी दिले. अन्वय नाईक यांनी जमिन विकल्यापेक्षा त्यांनी आत्महत्या कोणामुळे केली? याचा शोध घेतला पाहिजे. अर्णब गोस्वामी प्रकरण विरोधकांच्या विशेषत: भाजपच्या अंगाशी आल्याने वाचाळवीर किरीट सोमय्या नसती उठाठेव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जमिनीचा व्यवहार नियमानुसारच झाला
‘रवींद्र वायकर यांनी जमिनीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, २०१४ साली जमिनीचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार नियमानुसारच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमचा व्यवहार फक्त अन्वय नाईकांसोबत झाला आहे. आता या व्यवहाराला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्याप याबाबत किरीट सोमय्या काही बोले नव्हते. ज्यावेळी रिपब्लिकचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राजकारण करत हे मुद्दे समोर आणले. त्यांच्याकडे ३० जणांसोबत व्यवहार झाल्याचे पुरावे असल्यास सोमय्यांनी ते सिद्ध करावे’, असे खुले प्रतिआव्हान वायकरांनी किरीट सोमय्यांना केले आहे. ‘नाहीतर किरीट सोमय्यांनी तोंड काळ करावं’. तसेच सोमय्यांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे देखील वायकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
हेही वाचा – भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार – किरीट सोमय्या