घरमहाराष्ट्रबिहारसाठी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची मदत घ्या म्हणजे इथे शांतता नांदेल; सेनेचा टोला

बिहारसाठी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची मदत घ्या म्हणजे इथे शांतता नांदेल; सेनेचा टोला

Subscribe

शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रामध्ये ‘बिहारात राज्य, महाराष्ट्रात शांतता’ या अग्रलेखात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपला टोला लगावला आहे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल, असा टोला लगावला आहे.

“भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, ”नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला होता, तो पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे.” महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात,” असा टोला देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

- Advertisement -

“बिहारचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करीत आहेत. या ढोंगास काय म्हणावे! बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे.”

“मागच्या सरकारात भाजपचे सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश यांचे ते खंदे पाठीराखे होते. यावेळी भाजपने नितीशकुमारांचा हा पाठीराखा घरीच बसवला आहे. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री तर केले नाहीच, पण जास्त आकडय़ाच्या जोरावर भाजपने एक सोडून दोन-दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत. त्यामुळे नितीशकुमारांची डोकेदुखी वाढणार आहे. महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुडय़ा सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळय़ांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

- Advertisement -

“काँग्रेसची कामगिरी सुमार झाली त्याचे खापर फक्त राहुल गांधींवर फोडणे योग्य नाही. नितीशकुमार यांची कामगिरी तरी कुठे चमकदार झाली? ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव मात्र विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल,” असं शिवसेनेने सामनामध्ये म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -