भातसा नदीला पुराचा वेढा पडलेल्या वासिंद पुर्वेकडील नदी किनारी असलेल्या सृष्टी फार्महाऊस आणि पाठारे नर्सरी येथे अडकलेल्या ३२ पर्यटकांना सैन्य दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलवले. रविवारी पावसाळी सहलीसाठी मुंबई, ठाणे येथील एकूण ३२ पर्यटकांंचा जीव वाचवून त्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात बचावकार्यालयातील सैन्य दलाच्या टिमला सांयकाळी उशीरा यश आले आहे. भातसा नदीजवळील पुरात सैन्यदलाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने या पर्यटकांंची सुरक्षित सुटका केली.
मेजर आर.के.बॅनर्जी आणि त्यांच्या सहकारी सैनिकांनी दोन बोटींच्या सहाय्याने १७ महिला, १० लहान मुले आणि १० पुरुषांची सुखरूप सुटका केली. याच सैन्यदलाच्या टिमने भातसई गाडगेमहाराज येथे पुरामुळे एका इमारतीत दिवसभर अडकून पडलेल्या ३५० आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. शाळा व्यवस्थापनाच्या मदतीने विद्यार्थ्यांना पेंढरघोळ आश्रमशाळेत सुरक्षित नेऊन सोडले आहे. आता हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे गाडगे महाराज आश्रमशाळा अधिक्षक साठे यांनी सांगितले बचाव कार्य करत असताना भिवंडीचे प्रांताधिकारी, नंळदकर शहापूर तहसीलदार, रवींद्र बाविस्कर पोलीस प्रशासन वासिंद मधिल अनेक सेवाभावी कार्यकर्ते बचावकार्यातील मदतीसाठी सहभागी झाले होते.