राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची वाट न पाहता राज्य सरकार आकस्मित निधीद्वारे शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणे अत्यंत जरुरीच आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ११० कोटींची मागणी केली होती. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: हा प्रस्ताव घेऊन दिल्लीला गेले होते. मात्र, केंद्राकडून अद्यापही निधी आल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे सहा मंत्री देखील उपस्थित राहिले होते. या बैठकीनंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा – मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंची भेट; नाट्यमय घडामोडींनंतर पुन्हा युतीचे सरकार?
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी हा केंद्रबिंदू होता. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकासानीचा अंदाज घेण्याचे आदेश दिले आहेत.’ त्याचबरोबर ‘राज्यात अवकाळी पावसामुळे ७० लाख हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १९ लाख हेक्टर कापूस तर १८ लाख हेक्टर सोयाबीन आणि इतर नुकसानीचे अंदाज आहेत. आतापर्यंत ६० लाख हेक्टर जमिनीचे पंचनामे झाले आहेत. त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे मिळताना शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत, यासाठीही या बैठकीत चर्चा झाली’, असे मुनगंटीवार म्हणाले.
बैठकीत ‘या’ निर्णयांवर शिक्कामोर्तब
- कोकणापासून पूर्व विदर्भपर्यंत शेतकरी आणि शेतमजूरांना २ ते ३ रुपये किलो दराने धान्य पुरवठा केला जाईल
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची सफाई मनरेगाच्या माध्यमातून करणार
- शेतकऱ्यांकडून बँकांनी सक्तवसूलीची कारवाई करु नये.
हेही वाचा – आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु – शरद पवार