घरमहाराष्ट्रचक्रीवादळ; अन्नधान्य पुरवण्यासहीत नुकसानीचे पंचनामे करा - मुख्यमंत्री

चक्रीवादळ; अन्नधान्य पुरवण्यासहीत नुकसानीचे पंचनामे करा – मुख्यमंत्री

Subscribe

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब हे देखील सहभागी झाले होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील सुचना केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, रायगड जिल्ह्यात मध्ये घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचविणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणाने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या. संकट मोठे आहे, आपण सर्व कोरोनामध्ये दिवस रात्र काम करीत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की विशेषत: मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडतांना त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. .

- Advertisement -

तसेच मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या नशिबामुळे या चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. महत्वाचा मुद्दा असा की पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक अहमदनगर, कोकण विभागीय आयुक्त या बैठकीस उपस्थित होते.

खऱ्या अर्थाने सतर्कता काय असते ती पहायला मिळाली. विद्युत तारा, खांब पडणे यामुळे पुनर्वसन अवघड होते. हे प्राधान्याने लवकरात लवकर उभे करणे गरजेचे आहे. मदत जितकी लवकर पोहचेल तितके लोकांना दिलासा मिळेल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला सुदैवाने धोका पोहचला नाही. पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, ठाण्याला विशेष फटका बसला नाही. १६२ कच्च्या घरांची पडझड झाली, झाडांच्या फांद्या पडल्याच्या ३६० घटना घडल्या. जिल्ह्यातील सर्व मार्ग व महामार्ग सुरु झाले आहेत. उल्हासनगर येथे काही वेळासाठी दूरध्वनी सेवा खंडीत झाली होती अशी माहितीही त्यांनी दिली.

- Advertisement -

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, दापोली व मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. ३ हजार झाडे पडली आहेत. १४ सबस्टेशन, १९६२ ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब पडले आहेत, पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. पालघर, अहमदनगर, नाशिक जिल्हाधिकारी यांनी सुद्धा नुकसानीविषयी माहिती दिली. मुंबई शहरात २५ ठिकाणी झाडे पडली. तर मुंबई उपनगरमध्ये ५५ ठिकाणी झाडे पडली तसेच २ घरांची पडझड झाली. विभागीय आयुक्त कोकण यांनी देखील वीज पुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत अशी माहितीही देण्यात आली.

प्रारंभी प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर यांनी चक्रीवादळाविषयी माहिती देतांनी म्हणाले की, या वादळामुळे राज्यात ७२.५ मिमी पाउस झाला. सर्वात जास्त पाऊस १५२ मिमी जालना येथे झाला. राज्यात ७८ हजार १९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तर २१ एनडीआरएफ व ६ एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली होती. ६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून ६ जनावरे दगावली तर १६ नागरिक जखमी झाले. रायगड जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार ५०३३ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. मयत व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान लगेच द्यावे, असेही त्यांनी सांगितले.


या पावसाळ्यात मध्य रेल्वे रखडणार नाही; प्रशासनाने केली तयारी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -