अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. या संमेलनाचे उद्घाटन आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे करणार आहेत. त्यामुळे आता साहित्य संमेलनाच्या वादावर पडदा पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. परंतु, राजकीय दबावामुळे संमेलन आयोजकांनी हे आमंत्रण रद्द केले. त्यामुळे साहित्य संमेलनावर मोठमोठ्या लेखकांनी बहिष्कार टाकला आहे. संमेलनाच्या आयोजकांकडून सर्व साहित्यिकांना संमेलनाला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोण आहेत उद्घाटक?
नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून रद्द केल्यानंतर संमेलनाचे उद्घाटक कोण असतील, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरीची पत्नी वैशाली सुधाकर येडे यांची निवड करण्यात आली आहे. वैशाली येडे या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे राहतात. त्या एक अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना दोन लहान मुले आहेत. वैशाली येडे या श्याम पेठकर यांच्या ‘तेरव’ या नाटकातदेखील काम करतात. हे नाटक हरीश इथापे यांनी दिग्दर्शित केले आहे.