संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हाथरस प्रकरणी सुरू असलेला खटला राज्याबाहेर चालवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याची सुनावणी राज्याबाहेर चालवण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो, असे कोर्टाने निकालात म्हटले आहे. अलाहाबाद हायकोर्ट या प्रकरणाची देखरेख करेल, असेदेखील कोर्टाने म्हटले आहे. सध्या या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. त्यामुळे हा खटला तातडीने वर्ग करण्याची गरज नाही. इतर सर्व गोष्टींकडे हायकोर्टाचे लक्ष असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिज्ञापत्र स्वीकारले. सरकार पीडित कुटुंबाला आणि खटल्याशी संबंधित साक्षीदारांना सुरक्षा पुरवत असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने प्रतिज्ञापत्रात दिली आहे.