घरमहाराष्ट्रनिवडणूक पुढच्या वर्षी घ्या, पुराकडे लक्ष द्या-राज ठाकरे

निवडणूक पुढच्या वर्षी घ्या, पुराकडे लक्ष द्या-राज ठाकरे

Subscribe

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अभूतपूर्व पूर परिस्थिती उद्भवली असून पूर ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. लगेच ही परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे, त्याची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागेल. तेव्हा सरकारला कोणतीही मदत करता येणार नाही, त्यांना हात वर करण्याची संधी मिळेल. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी घ्याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी ही मागणी केली.

दोन तीन दिवसांनी पुराचे पाणी ओसरेल. त्यानंतर मात्र पूर आलेल्या भागात रोगराई पसरू शकते. पूर ओसरल्यानंतरही जनजीवन सुरळीत व्हायला दोन ते तीन महिने लागतील. तसेच सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागल्यानंतर सरकारला मदत करता येणार नाही. त्यामुळे सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या मागणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीतील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. निवडणूक कधी घ्यायच्या याचा निर्णय निवडणूक आयोग घेतो, सरकार नाही, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

- Advertisement -

इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासकीय गहू आणि तांदळाच्या पाकिटावर भाजपची जाहिरात केल्याबद्दलही राज ठाकरे यांनी टीका केली. मनसेचे कार्यकर्ते पहिल्या दिवसांपासून पूरग्रस्त परिसरात काम करत आहेत. पण त्यांनी कुठेही फोटो लावला नाही. आम्ही जाहिरातबाजी केली नाही. मात्र भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आला असल्यामुळे त्यांनी लाज सोडली आहे, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही या वक्तव्याचाही राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपच्या लोकांना त्यांचे किती आमदार निवडून येतील याचा अंदाज येतो, मग पुरात किती पाणी भरेल याचा अंदाज कसा येत नाही? असा आरोप ठाकरे यांनी केला. पूरपरिस्थिती गंभीर झाल्यानंतर लगेच लष्काराला पाचारण करण्यात का आले नाही? सरकार कशाची वाट पाहत होते, असाही आरोप त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -