घरमहाराष्ट्ररामायण - महाभारताचे शिक्षण द्या - हिंदू जनजागृती समिती

रामायण – महाभारताचे शिक्षण द्या – हिंदू जनजागृती समिती

Subscribe

भावी पिढी सुजाण, संस्कारक्षम आणि चारित्र्यसंपन्न होण्यासाठी त्यांना रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हिंदूना त्यांच्या धर्मग्रंथांचे शिक्षण सर्व शाळा - महाविद्यालयांमधून प्रतिदिन देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे.

आजची हिंदू युवापिढी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे चंगळवाद, व्यसनाधीनता आणि वासनांच्या आहारी जात आहे. त्यामुळे युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून देण्यात यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे. समितीच्या वतीने झाशीची राणी चौकात आंदोलन करण्यात आले त्यावेळी ही मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने तात्काळ कायदा करुन राममंदिर उभारावे अशीही मागणी यावेळी जोर धरु लागली.

धार्मिक शिक्षणाला अटकाव

हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे लज्जास्पद आहे. केंद्रात आणि उत्तर प्रदेशात दोन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे श्रीराम मंदिर उभारणीसाठी संसदेत तात्काळ कायदा बनवून अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच भारत धर्मनिरपेक्ष देश आहे असे सांगून मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते. तसेच ख्रिस्ती मिशनरींच्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये बायबल शिकवले जाते. परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू विद्यार्थी ज्या शाळांत शिकतात, तेथे धार्मिक शिक्षणाला अटकाव केला जातो. असा आरोप समितीकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

धर्मशिक्षणातून नीतीमत्ता येते. सध्या ते मिळत नसल्याने समाजात चोऱ्या, खून, दरोडे, बलात्कार आणि भ्रष्टाचार आदींसारखे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे भावी पिढी सुजाण, संस्कारक्षम आणि चारित्र्यसंपन्न होण्यासाठी त्यांना रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हिंदूना त्यांच्या धर्मग्रंथांचे शिक्षण सर्व शाळा – महाविद्यालयांमधून प्रतिदिन देण्यात यावे असे यावेळी सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -