नुकताच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि १०० हून अधिक धावांनी पराभूत करत मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे विराट सेनेवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच विराट कोहलीने व्यक्त केलेल्या एका इच्छेने समस्त मराठी मनांचा ठाव घेतला आहे. कर्णधार विराट कोहलीला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड पाहायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज यांच्यासोबत झालेल्या भेटीमध्ये विराट कोहलीने ही इच्छा व्यक्त केली आहे. खुद्द संभाजी महाराज यांनीच आपल्या ट्वीटरवर या भेटीचे फोटो ट्वीट केले आहेत. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य 'जतीन परांजपे' यांनी विराट कोहली सोबत आज भेट घडवून आणली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती जतीननी बहुदा अगोदरच सांगून ठेवली होती त्यामुळे, विराटने स्वतःहुन रायगड किल्ल्यावर येण्याची ईच्छा व्यक्त केली. pic.twitter.com/JeCcKFpMio
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 12, 2019
पुण्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान शनिवारी विराट कोहलीने संभाजी महाराज यांची भेट घेतली. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांनी ही भेट घडवून आणल्याचं संभाजी महाराज यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘जतीन परांजपे यांनी विराट कोहलीसोबत भेट घडवून आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती जतीनने आधीच सांगून ठेवली होती. त्यामुळे विराटने स्वत: रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा व्यक्त केली’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय, येत्या काळात ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना योग्य संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे’, अशी देखील पोस्ट संभाजी महाराज यांनी केली आहे.
येत्या काळात 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन' च्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना योग्य संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 12, 2019
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्यात झालेल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत कसोटी मालिका खिशात घातली. त्यासोबतच कर्णधार विराट कोहलीने भारताचा माझी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाला मागे टाकलं आहे. पहिल्या ५० सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहलीने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. याआधी धोनीच्या नावावर ५० सामन्यांमध्ये २६ विजय होते. आता विराट कोहलीच्या नावावर ५० सामन्यांमध्ये ३० विजय नोंद झाले आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ (३७ विजय) असून त्याच्या खालोखाल दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार रिकी पाँटिंग (३५ विजय) आहे.