राज्यात मागील काही दिवसात पावसाने थैमान घातले होते. यंदाच्या पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात भीषण महापूर आला. या महापूरमुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांचे संसार वाहून गेले. काही जणांच्या डोक्यावरचे छप्पर देखील वाहून गेले आहे. या महाराष्ट्रावर अस्मानी संकट आल्याने त्याच्या मदतीसाठी ठाण्यातून विविध संस्थाकडून मदतीचा ओघ सुरू आहे. ठाण्यातील आनंद विश्व् गुरुकुल महाविद्यालय आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय या दोन महाविद्यालयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे गाव दत्तक घेतले आहे.
नक्की वाचा – पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार- नाना पाटेकर
बुधवारी संध्याकाळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी स्वता त्या भागांमध्ये जाऊन अन्न, कपडे, चादरी, झाडू, भांडी आदी वस्तूंचे स्वतः वाटप करणार आहेत. जवळपास २० टनांचा माल घेऊन ही मंडळी कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत. भेंडवडे गावातील ६५० घरापर्यंत अजून मदत पोहचलेली नाही. त्यामुळे हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. प्रत्येक घराघरात मदत पोहचवली जाणार आहे. त्यामुळे ही महाविद्यालये भेंडवडे गावाचा आधार बनली आहेत.
हेही वाचा – ‘लालबागचा राजा’ मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत