काँग्रेस ही एक विचारधारा असून, पक्षाला जनाधार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पक्ष पुन्हा ताकदीने उभा करू, असा विश्वास जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केला.येथील पी. जी. सिटी सभागृहामध्ये सोमवारी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील, रोह्याचे उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकूर, सरचिटणीस धनंजय देशमुख, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे आमदार नसले तरी प्रामाणिकपणे काम करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बळावर पक्ष पुन्हा उभा राहील, असा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात पक्षाला ताकद मिळवून देतील, असे पदाधिकारी नेमायचे आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये दर महिन्याला यापुढे काँग्रेसची बैठक घेतली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा जगताप यांनी केली. यावेळी प्रमुख पदाधिकार्यांनी आपले विचार मांडले. जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीत पाडगावकर यांनी रायगडमध्ये काँगेसची ताकद वाढवायची असेल तर माणिक जगताप यांना विधान परिषद सदस्य करावे अथवा महामंडळ द्यावे, असा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला.