शहरात मध्यवर्ती स्मशानभूमी असावी या मागणीकरिता स्थानिक सन्मित्र ग्रुपने मंगळवारी उपोषणाचे हत्यार उपसले होते. या मागणीला अनेक सामाजिक संस्थानी लेखी पाठिंबा दर्शवला आहे. नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर सायंकाळी उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.शहरापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेली हिंदू अमरधाम स्मशानभूमी माथेरानकरांसाठी नेहमी डोकेदुखी ठरत आहे. अंत्यविधीसाठी जाणार्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या सन्मित्र ग्रुुपने स्मशानभूमीच्या मागणीसाठी श्री राम चौक येथे सकाळी ९ वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली. चंद्रकांत सुतार, केतन रामाणे, विजय मोरे, राजू जाबरे, राजेंद्र कुंभार, ललित पांगसे, स्वप्निल गोसावी, सुरेश शिंदे, विजेंद्र देशमुख, महेंद्र जाबरे, समित परिट आदी यात सहभागी झाले होते.
त्यांनतर प्रशासनाने याची दखल घेत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगर परिषदेचे अधीक्षक बापूराव भोपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी नगर परिषदेकडून सनियंत्रण समिती, तसेच जिल्हाधिकार्यांकडे या संदर्भात, तसेच दुसरा पर्याय म्हणून शववाहिनीचा पाठपुरावा करून प्रस्ताव पाठविला जाईल, असे नगराध्यक्षांनी आश्वासन दिले.
या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबिता शेळके,अश्वपाल संघटनेच्या आशा कदम, माजी नगरसेवक अवधूत येरफुल्ले, प्रकाश सुतार, वनसंरक्षक समितीचे योगेश जाधव, तसेच कोकणवासीय समाजाचे शैलेंद्र दळवी, मराठा समाजाचे कुलदीप जाधव, गुजराती समाजाचे नितीन शहा, आगरी समाजाचे नितीन शेळके, चर्मकार समाजाचे रमेश साळुंखे आदींनी तेथे हजेरी लावली होती.