तुळशी विवाहानंतर सुरू होणार्या विवाहांची ‘लगीन घाई’ सुरू झाल्याने लागणारे विविध साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र या साहित्यांच्या किमतीत दरवर्षी वाढ होण्याची अघोषित परंपरा यंदाही कायम असल्याने वधू-वर पक्षाचे बजेट कोलमडत आहे.
विवाह म्हटला की आजच्या युगात सर्वसामान्य माणूसही कर्ज, उधार उसनवारी करून किंवा साठवलेली पुंजी खर्च करतो. कपडे, वाजंत्री, मंगल कार्यालय, सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य यावर मोठा खर्च होत असतो. मात्र हा खर्च करताना अनेकांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यात सोन्याचा प्रति तोळा दर चाळीस हजाराच्या आसपास पोहचल्याने करायचे काय, असा सवाल त्यांच्यापुढे उभा राहत आहे.
पूर्वीच्या तुलनेत विवाह पद्धती बदलत गेल्याने ऐपत नसताना वधू-वर पक्षाला नाइलाजास्तव सर्वांची हौस भागविण्याची वेळ येते. पूर्वी पळस, जांभूळ वृक्षांच्या डहाळीचा मांडव तयार करण्यात येत होता. आता ही जागा मंगल कार्यालयाने घेतली आहे. यावर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यात वधू किंवा वर यापेैकी एखादा पक्ष आर्थिकदृष्ट्या वरचढ असेल तर दुसर्याची प्रचंड आर्थिक ओढाताण होत असते. त्यामुळे जमा पुंजी आणि खर्च यांची तोंडमिळवणी करताना सर्वसामान्य वधू-वर पक्षांची चांगलीच दमछाक होत आहे.