भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. मुख्यमंत्री ठाकरे गाडी थांबवून खाली उतरले आणि त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. १5 वर्षे झाली तरी शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकर्यांनी त्यांच्याकडे केली. 31 हजार कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली. ठाकरे यांनी गाडीतून खाली उतरून निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अचानक ताफा थांबवून शेतकर्यांनी गार्हाणे मांडल्याने पोलीस आणि प्रशासनाची कार्यक्रमस्थळी प्रचंड तारांबळ उडाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा स्थळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भेट दिली. राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणातून चंद्रपूरच्या वाट्याला येणारे पाणी घोडाझरी कालव्याच्या अपुर्या कामामुळे गेली अनेक वर्षे रोखले गेले आहे. कंत्राटदारांनी थातूरमातूर काम करून हा प्रकल्प रखडवला, असा आरोप शेतकर्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने या कामाला आता गती देण्याचे निश्चित केले. या कालव्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हेलिकॉप्टरद्वारे पोहोचले. प्रत्यक्ष कालवा स्थळी पोहोचून त्यांनी अधिकार्यांकडून संपूर्ण योजनेची माहिती घेतली. हा घोडाझरी भूमिगत कालवा असून सुमारे 55 किलोमीटर लांब भूमिगत वाहिन्यांद्वारे पाणी शेतीला पोहोचविले जाणार आहे. मुख्यत्वे वन कायद्याचा अडसर असल्याने हे काम पूर्णत्वास जात नव्हते. कालवा स्थळाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात विदर्भापासून केली. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे, निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या विस्थापितांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल’, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
आशा पल्लवित करणारा दौरा
शेतीला पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेला हा दौरा शेतकर्यांच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या प्राधान्यक्रमाचा मुद्दा असून पुढील 4 वर्षांत यासाठी 5 हजार कोटी रुपयांची गरज आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगताना यामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
भंडार्यात निराशा
भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाची पाहणी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी प्रकल्पाची पाहणी करताना प्रकल्पग्रस्त शेतकर्यांशी संवाद न केल्याने शेतकरी नाराज झाले. गोसीखुर्द धरणाला शुक्रवारी 33 वर्षे पूर्ण झाली असून अद्यापही धरण पूर्णत्वास गेलेले नाही. 33 वर्षांत अनेक सरकार आले; पण प्रकल्प पूर्ण झाला नाही, अशी व्यथा तिथल्या शेतकर्यांची होती.