वंचित बहुजन आघाडीने आज, शुक्रवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. नागरिकत्वच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठ – दहा दिवसांत राज्यभर दौरा करुन बंदच्या नियोजनाबाबत चर्चा केली आहे. नागरिकत्वसह केंद्र सरकारने अलीकडे अस्तित्वात आणलेल्या नव्या कायद्यामुळे नागरिकांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांच्या हितासाठी म्हणून बंद असेल, असे त्यांनी जाहिर केले आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष असून सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
‘महाराष्ट्र बंद’ला ३५ संघटनांचा पाठिंबा
सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या ज्या संघटनांनी आंदोलन केले आहे. त्या सर्वच संघटनांना वंचित बहुजन आघाडीने बैठकीसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीला जवळपास ३५ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली होती. तसेच सीएए आणि एनआरसीसोबतच देशाच्या आर्थिक स्थितीवरही आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत सर्वांचेच होते. त्यानुसार या सर्व मुद्द्यांवर मुंबईसकट महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा, असे आमचे आवाहन असून या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – ग्रह-तारे सांगतात, पुढील दहा वर्षे अमित ठाकरेंची