शहरातील संत साहित्याचे थोर अभ्यासक आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी, २३ मार्चला पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॉ. पाठक हे ७३ वर्षांचे होते. डॉ. पाठक यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना, विवाहित कन्या, तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवरांनी गंगापूर रोडवरील निर्मला कॉन्व्हेण्टनजीक असलेल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले.
डॉ. यशवंत पाठक यांच्या विषयी थोडक्यात
डॉ. पाठक यांचे महाविद्यालयीन शिक्षण मनमाडयेथील महात्मा गांधी महाविद्यालयात झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातही विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले होते. संत साहित्यावर त्यांनी महाराष्ट्रभर रसास्वादी व्याख्याने दिली आहेत. तसेच कीर्तनकार गौतमबुवा पाठक यांच्या संस्कारमुळे डॉ. पाठक कीर्तनही करत. संत ज्ञानेश्र्वरांचे ते गाढे अभ्यासक होते. पाठक यांच्या अनेक पुस्तकांना शासनासह मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. मनमाडसारख्या अडगावी बरीच वर्षे राहिल्यामुळे त्यांच्या साहित्याची, अभ्यासू वक्तृत्वाची आणि आध्यात्मिक प्रासादिक मांडणीची, साहित्य क्षेत्रात हवी तशी दखल घेतली गेली नाही. मात्र, त्यांना दूरदर्शनवर सातत्याने निमंत्रित केले जायचे.
यशवंत पाठक यांची ग्रंथसंपदा
- आनंदाचे आवार
- चंद्राचा एकांत
- कीर्तन प्रयोग
- पहाट सरी
- चंदनाची पाखर
- येणे बोधे आम्हा असो सर्व काळ
- संचिताची गोजागिरी
- ब्रम्हगिरीची सावली
- नाचू कीर्तनाचे रंगी
- मोह मैत्रीचा
- अंगणातले आभाळ
- आभाळाचं अनुष्ठान
- मनाच्या श्लोकाचे “मर्म”