रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा सुसंस्कृत खासदार कसा नसावा याचे उत्तम उदाहरण लोकसभेचे उमेदवार निलेश राणे यांनी दिलं आहे. त्यांनी चक्क पोलिसांनाच शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता आणि पैसा यांच्या जोरावर निलेश आणि नितेश राणे यांनी सत्ता मिळवली. मात्र आम्ही त्यांच्या सत्तेची मस्ती उतरवली. या लोकसभा निवडणुकीतही रत्नागिरी-सिंधुदुर्गची जनता राणेंच्या दहशतीला चोख उत्तर देईल असे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली येथे सांगितले. कणकवलीयेथील विजय भवन मध्ये नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले नाईक –
गोवा येथील टोलनाक्याची तोडफोड, मुंबईतील बिल्डरांकडून खंडणीचे वसुली, राजन तेली यांच्या मुलाला मारहाण असे दहशत पसरवणारे प्रकार नारायण राणे यांच्या मुलांनी केले आहेत. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या मुलांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण दहशतीच्या प्रवृत्तीमुळे राणे यांच्या दोन्ही मुलांना कुठल्याही पक्षाने घेतलेले नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गातील जनताही त्यांना कधीच स्वीकारणार नाही.
तुम्ही इतर उमेदवारांचे शिक्षण काढता, इंग्रजी भाषेबद्दल बोलता आणि स्वतः काय करता याचा विचार आधी करावा आणि नंतरच इतरांना उपदेश करावा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. रत्नागिरी सिंधुदुर्गात गेली चार वर्षे दहशतीचे प्रकार नव्हते, पण राणे यांनी पुन्हा एकदा दहशतीचे प्रकार सुरू केले आहेत.
शिवसेनेच्या निष्ठावंतांना ही राणे यांनी नुकताच उपदेशाचे डोस पाजतात. पण आमच्या निष्ठावंतांची काळजी तुम्ही करू नका. राजन तेली, संजय पडते, काका कुडाळकर अशा अनेक निष्ठावंतांना तुम्ही दुखावले आहे. त्यामुळे तुम्ही आधी तुमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची काळजी घ्या. लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभिमान पक्ष कोठेच असणार नाही त्यामुळे स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आपलं काय होईल याचा विचार करावा आणि योग्य व्यक्तीला मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.